मधु कांबळे मुंबई : भाजपचे निष्ठावान दिवंगत खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय शिवसेनेत गेल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना विजयी करण्यासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यात ते यशस्वी झाले, एका अर्थाने मुख्यमंत्रीच ही पोटनिवडणूक जिंकले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यशैलीवर टीका करीत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे हा पराभव मोदी-शहा यांचा असल्याचे मानले जात आहे. पालघर जिल्ह्य़ातील आदिवासी समाजातील एक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले अॅड. चिंतामण वनगा २०१४च्या निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले होते, मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे पालघरमध्ये पोट निवडणूक घेण्यात आली. वनगा यांच्या निधनामुळे भाजप त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देतील, असा अंदाज होता. परंतु उमेदवारी निश्चित होण्याच्या आधीच वनगा कुटुंबीयांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पालघरची निवडणूक कधीही न लढविणाऱ्या शिवसेनेने ती लढविण्याचा निर्णय घेतला आणि चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. वनगा कुटुंबीयांवर भाजपने राजकीय अन्याय केला, अशी टीका करण्याची संधी निवडणूक प्रचारात शिवसेना नेतृत्वाने सोडली नाही. शिवसेनेने वनगा कुटुंबातीलच व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेची ही खेळी भाजपच्याही जिव्हारी लागली. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेतली. काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गावित यांना अखेरच्या क्षणी भाजपमध्ये घेऊन त्यांना पालघर पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस, माकप, बहुजन विकास आघाडी मैदानात असली तरी, खरी लढाई शिवसेना व भाजपमध्येच झाली. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी त्यांनी सर्व ताकद, प्रतिष्ठा पणाला लावली. त्यात शिवसेना व अन्य पक्षांशी कडवी झुंज देत राजेंद्र गावित विजयी झाले. हा विजय मुख्यमंत्र्यांचा मानला जातो. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन खासदार झालेल्या नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत थेट खासदारकीचा राजीनामा देत भाजपलाही रामराम ठोकला. त्यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघातही पोटनिवडणूक झाली. पंतप्रधानांवर टीका करून पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची निवडणूक होती. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवरील टीकेला उत्तर देण्यासाठी भंडाऱ्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली नाही. यामुळे लोकसभेतील एकूण भाजपच्या संख्याबळातील एक आकडा कमी झाला आहे.