महाराष्ट्रासह पाच राज्यांत रुग्णवाढ; दिवसभरात १३,९९३ बाधित

धोरण ठरविण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्रासह पाच राज्यांतील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली.

सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी  मागणी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत केली. निती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी करोना निर्बंध शिथिलझाल्यापासून करण्यात येत आहे.

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. ती टाळण्यासाठी केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

पाच राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधील एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण ७५.८७ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

छत्तीसगडमध्ये गेल्या सात दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २५९ जणांना संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. केरळमध्येही दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमध्येही गेल्या सात दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली. या राज्यांत गेल्या २४ तासांत ३८३ रुग्णांची नोंद झाली. मध्य प्रदेशमध्येही १३ फेब्रुवारीपासून करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे, गेल्या २४ तासांत २९७ जणांना संसर्ग झाला. दरम्यान, गेल्या २४ तासांत १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

मुख्यपट्ट्यांची भेट

दादर येथे मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुखपट्ट्या भेट देऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी आरक्षित ठेवलेल्या पंचतारांकित हॉटेलचीही त्यांनी नुकतीच पाहणी केली.

गरज काय?

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे आणि गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे. केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलल्यास उपनगरी गाड्यांची गर्दी विभागली जाईल.

मुंबई-राज्यात… 

राज्यात गेल्या २४ तासांत ६,२८१ नव्या रुग्णांचे निदान.

मुंबई शहरात ८९७ जणांना संसर्ग, तिघांचा मृत्यू.

ठाणे शहरात १४७, नवी मुंबईत ११६, कल्याण-डोंबिवलीत १४५ रुग्णनोंद.

रुग्णवाढ सुरू राहिल्यास सोमवारपासून निर्बंधांची तयारी.

२२ दिवसांनंतर प्रथमच २४ तासांत १३,९९३ जणांना संसर्ग झाल्याची केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती.

२९ जानेवारी रोजी १८,८५५ रुग्ण आढळले होते; त्यानंतरची ही मोठी रुग्णवाढ.  एकूण बाधितांची संख्या एक कोटी नऊ लाख ७७ हजार ३८७ वर.

देशात एका दिवसांत १०१ रुग्णांचा मृत्यू, त्यापैकी ४४ महाराष्ट्रातील.

पाच राज्यांतील स्थिती

राज्य   रुग्णवाढ

  • महाराष्ट्र         ६,२८१
  • केरळ   ४,६५०
  • पंजाब  ३८३
  • मध्य प्रदेश      २९७
  • छत्तीसगड       २५९

 

  • २४ तासांत…
    राज्यात गेल्या २४ तासांत ६,२८१ नव्या रुग्णांचे निदान.
    मुंबई शहरात ८९७ जणांना संसर्ग, तिघांचा मृत्यू.
    ठाणे शहरात १४७, नवी मुंबईत ११६, कल्याण-डोंबिवलीत १४५ रुग्णनोंद.
    रुग्णवाढ सुरू राहिल्यास सोमवारपासून निर्बंधांची तयारी.