एकमेकांविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्ये करून कार्यकर्त्यांना हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. सार्वजनिक सभांच्या माध्यमातून दोन्ही नेते एकमेकांवर चिखलफेक करीत होते, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि हिंसाचार होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राज ठाकरे यांनी तर आपल्या भाषणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कृषीमंत्री शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे.