मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी सुडबुद्धीतून झाल्याचा कौल जनमताने दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी साडेआठ तास चौकशी झाली. याच संदर्भात लोकसत्ता ऑनलाइनने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल नेटवर्किंगच्या लोकसत्ता ऑनलाइनच्या पेजवर, 'सक्तवसुली संचलनालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची चौकशी सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप पटतो का? ' हा प्रश्न विचारला होता. फेसबुकवर २ हजार लोकांनी या प्रश्नावर मतं दिली. ज्यापैकी ६८ टक्के लोकांनी कारवाई सुडबुद्धीतून झाल्याचं म्हटलं आहे. ३२ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. #LoksattaPoll: सक्तवसूली संचालनालयाकडून @mnsadhikrut अध्यक्ष राज ठाकरेंची चौकशी ही सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप पटतो का? — LoksattaLive (@LoksattaLive) August 22, 2019 ट्विटरवर हाच प्रश्न लोकसत्ता ऑनलाइनने विचारला होता. या प्रश्नाला ७१३ मतं आली. ६४ टक्के लोकांनी राज ठाकरे यांच्यावरची कारवाई सुडबुद्धीने झाल्याचं म्हटलं आहे. तर ३६ टक्के लोकांनी या प्रश्नाला नाही असं उत्तर दिलं आहे. गुरुवारी राज ठाकरे ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची साडेआठ तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर किती चौकशा करायच्या आहेत त्या करुद्यात मी माझं तोंड बंद ठेवणार नाही, मो बोलतच राहणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ईडीने राज ठाकरेंची साडेआठ तास चौकशी केली त्यानंतर राज ठाकरे ईडी कार्यालयातून कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना माझं तोंड बंद ठेवणार नाही बोलतच राहणार अशी प्रतिक्रिया दिली.