गोव्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या आपल्याचे पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही भाजपाला दूर सारुन सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नेत्याचा पाठींबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, आपण गोव्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राऊत म्हणतात, “गोव्यात भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (एमजीपी) नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.”

महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंही ते म्हणाले होते.

दरम्यान, राऊत यांच्या वक्तव्यानंतर २४ तासांच्या आतच गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं होतं. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली होती. गोव्यात ४० पैकी ३० आमदार हे भाजपाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसू, असं चोडणकर यावेळी म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा, असा टोला भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला होता.

२०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त १७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपा फक्त १३ जागांवर विजय मिळवू शकला होता. पण भाजपाने संधी साधत इतर पक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली होती. भाजपाला गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिला होता. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून राज्यात आणण्यात आलं होतं. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.