भिवंडी येथील खोणी-खाडीपार परिसरातील भारतनगरमध्ये गुरुवारी रात्री ७० वर्षांपुर्वीचे वडाचे झाड घरांवर कोसळून झालेल्या अपघातात माय-लेक ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात ११ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतनगरमधील एका वस्तीत राहणाऱ्या अनिसाखातून अन्सारी (२०) आणि त्यांचा मुलगा मोहम्मद रजा (५ महिने) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शबाना अफताब अन्सारी, मन्नाबी शेख, सईदा नसीर शेख, हिना मेहबूब शेख, दौलतबी सलीम शेख, रुबा मोहम्मद, रमनिरू मेहबूब अन्सारी, रनाबी खान, जाफरा अन्सारी, अफताब अन्सारी अशी जखमींची नावे आहेत. भारतनगर वस्तीत रमजाचा महिन्या असल्याने रात्री रोजा सोडल्यानंतर जेवणाची मोठी लगबग सुरु होती. त्याचवेळी वस्तीतील वडाचे झाड ११ घरांवर अचानक कोसळून हा अपघात घडला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घरात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.