चेंबूरच्या सुमन नगर येथील तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अवघ्या ४८ तासांत कोकणातून अटक करण्यात आली.
२१ जुलै रोजी चुनाभट्टी पोलिसांना चेंबूरच्या सुमननगर येथे एक जखमी तरुण आढळला होता. त्याला उपचारासाठी शीव रुग्णालयात नेण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. मणीगंडन अर्जुन (१९) असे या तरुणाचे नाव होते. या प्रकरणी गुन्हे शाखा ४ च्या पथकाने कोकणातील दापोली येथून समीर बबन कळफ उर्फ गणेश आणि दीनानाथ कोरी उर्फ बाबू या दोघांना अटक केली. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले की, मयत अर्जुन आणि हे दोन्ही आरोपी समोरासमोरच्या झोपडपट्टीत राहात होते. काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून अर्जुनने समीर कळप याला मारहाण केली होती. त्याचा राग धरून या दोघांनी हॉकी स्टीक व काठीने मारहाण करून त्याला फेकून दिले होते.