गेल्या २४ तासांत मुंबईत आत्महत्येच्या दोन घटनांची नोंद झाली असून पहिल्या घटनेत एका १७ वर्षे वयाच्या तरुणीने तर दुसऱ्या घटनेत १८ वर्षे वयाच्या तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंड येथे राहणाऱ्या तरुणीने सोमवारी रात्री आठ वाजता राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी आढळलेली नाही.
अलीकडेच तिने बारावीची परीक्षा दिली होती. सध्या ती नोकरीच्या शोधात होती. तिच्या आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकलेले नसले तरी नैराश्यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दुसऱ्या घटनेत, मालवणी येथे राहणाऱ्या वैभव पटेल या तरुणाने मंगळवारी सकाळी घरातील फॅनला लटकून आत्महत्या केली. वैभव हा बारावी परीक्षेत तीन वेळा अनुत्तीर्ण झाला होता. सर्व कुटुंबीय गुजरातला गेलेले असताना त्याने आत्महत्या केली. कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना वैभवचा मृतदेह आढळून आला. परीक्षेत आलेल्या अपयशामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.