'आकाशगंगा', 'आम्ही जातो आमुच्या गावा', 'भालू' आणि 'प्रेमासाठी वाट्टेल ते' या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या हृदयविकाराने त्रस्त होत्या. त्याशिवाय वयोमानामुळेही त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आजारपणाशी झुंज देतानाच अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 'हवास तू.', 'गुडिया हमसे रुठेगी' या गाण्यांसाठीही त्या ओळखल्या जातात. उमाताईंवर चित्रीत करण्यात आलेली ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांनी १९६० मध्ये 'आकाशगंगा' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठीसह त्यांनी तेलगू आणि तमिळ चित्रपटांतही अनेक भूमिका साकारल्या होत्या. मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या भेंडे यांनी साठ- सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्या काळच्या आघाडीच्या मराठी अभिनेत्रींमध्येही उमाताईंचं नाव घेतलं जायचं.