रक्षाबंधनासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या अनमोल संदल (२२) या तरुणाचा मृतदेह  जुहू समुद्रकिनाऱ्यावर सापडला.  सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अनमोल मूळचा दिल्लीचा राहणारा होता. गेल्या शुक्रवारी तो रक्षाबंधनानिमित्त आपल्या भावासह मालाड येथे राहणाऱ्या बहिणीकडे आला होता. नंतर तो मंगळवारी ओशिवरा येथील काकांकडे गेला होता. पण तो परतला नव्हता. त्याच्या कुटुंबीयांनी मग रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छदेनासाठी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.