संजय बापट

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वपक्षीय साखरसम्राट आमदारांच्या नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेत महायुती आघाडी सरकारने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या १३ साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास दोनच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक साखर कारखान्यांनी सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचे प्रस्ताव सरकारकडे पाठविले होते. या सर्व कारखान्यांची छाननी करून त्यानुसार सरकारच्या हमीवर कर्जाचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने १३ कारखान्यांची निवड केली आहे. त्यामध्ये भाजपचे ५ राष्ट्रवादीचे ७ आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे.

हेही वाचा >>>मुंबईत मंगळवारी अतिरिक्त पाणी कपात

काँग्रेस आमदाराच्या कारखान्यालाही मदत

विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) ८० कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांच्या कारखान्यांना ही मदत नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्जहमीचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यात आला असून त्यांची मान्यता मिळताच कर्जाची रक्कम सरकारकडे जमा होईल.

अजित पवार गट

●लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) १०४ कोटी

●किसनवीर (सातारा)३५० कोटी

●किसनवीर (खंडाळा) १५० कोटी

●लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) १५० कोटी

●अगस्ती (अहमदनगर) १०० कोटी

●अंबाजोगाई (बीड)८० कोटी

●शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ११० कोटी

भाजपशी संबंधित

●संत दामाजी(मंगळवेढा)१०० कोटी,

●वृद्धेश्वर (पाथर्डी)९९ कोटी

●सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) १२५ कोटी

●तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) ३५० कोटी

●बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) १०० कोटी