रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे अन्नातून विषबाधा झाल्याने ३ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली. त्याचबरोबर एका मुलाची प्रकृती गंभीर असून इतर १९ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खालापूर येथे सोमवारी रात्री एका कार्यक्रमात केलेल जेवनातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या अन्नाचे सेवन केल्यानंतर ६१ जणांना विषबाधा झाली. दरम्यान, बाधित झालेल्या सर्व जणांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, यांपैकी ३ मुलांचा उपचारांदरम्यान दुर्देवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तर १९ जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ही अपघाती घटना असल्याने पोलिसांनी यामध्ये झालेल्या मृत्यूंची आकस्मित नोंद केली आहे. तसेच अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.