एका वैद्यकीय परिषदेसाठी मुंबईहून औरंगाबादला निघालेल्या डॉक्टरांच्या बसचा अहमदनगरजवळील केडगाव येथे भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय आणि इतर काही रुग्णालयांतील डॉक्टर असे ४० जण या बसमध्ये होते. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून सर्वांना अहमदनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व डॉक्टर कर्करोगतज्ज्ञ असून एका परिषदेसाठी ते निघाले होते.

पहाटेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात केडगाव बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची बस पाठीमागून एका कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यातच चालकाचा जागच्या जागी मृत्यू झाला. तर डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे गाडीवरूल नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.