मुंबई:रेल्वे भरती परीक्षेच्या निकालावरून गेल्या आठवडय़ात उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा रद्द कराव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये रेल्वे भरतीवरून हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. या दोन्ही राज्यांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी रेल्वे मार्गावर ठाण मांडले होते. रेल्वे गाडी पेटवून देण्यात आली. बिहारमध्ये बंद पाळण्यात आला. भाजपशासीत उत्तर प्रदेश व बिहार (या राज्यात भाजप सत्तेत भागीदार आहे) या दोन राज्यांमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर बिगर भाजपशासीत महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा रद्द कराव्यात म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कोणी एका वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्याच्या व्हिडिओवरून राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन झाले, या मागे संघटित शक्ती असावी, असा संशय व्यक्त केला जातो. एका व्यक्तीच्या आवाहनानुसार एवढे विद्यार्थी रस्त्यावर येणे अशक्य असल्याचे बोलले जाते. गेले दोन दिवस ती व्यक्ती समाज माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंसाचाराला प्रोत्साहन देत होती. तेव्हा पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करीत होता, असा सवाल केला जात आहे. पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे हे सारे अपयश मानले जाते. घटनेची चौकशी - गृहमंत्री वळसे-पाटील शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले. याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही वळसे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.