हल्ली शेतकऱ्यांना मदत करणे ही एक फॅशन बनली आहे, असे विधान करून भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. राज्य सरकारच्या ‘जलशिवार’ योजनेबाबत पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी ही मुक्ताफळे उधळली.येत्या काही वर्षात दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागेल. अशाप्रकारचे बदल हे एका रात्रीत घडत नाही. मात्र, सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत. हल्ली ही एक फॅशन झाली आहे. लोकांना सवयच लागली आहे, असे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले. याशिवाय, सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत ही केवळ राज्या-राज्यांतील स्पर्धेचा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाच लाख नुकसानभरपाई दिली की अन्य राज्यातील सरकार लगेचच ७-८ लाख रूपयांची घोषणा करतात. शेतकऱ्यांना मदत देण्याची स्पर्धाच लागली आहे, असे शेट्टी म्हणाले.
शेट्टी यांच्या या वकव्यावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपचे नेते किती असंवेदनशील आहेत, याचा हा पुरावा असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे.