ओला, उबेर या खासगी टॅक्सीचालकांविरोधात मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी मंगळवारपासून पुकारलेला प्रस्तावित बेमुदत संप तूर्त मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप तूर्त मागे घेत असल्याचे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संघटनेने जाहीर केले.
गेल्या महिन्यात याच मुद्दय़ावर रिक्षा-टॅक्सी चालकांचा एक दिवसाचा संप करणाऱ्या जय भगवानदादा महासंघाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणेच खासगी टॅक्सी समन्वयकांना नियमावली लागू करावी, ही या संघटनेची प्रमुख मागणी आहे. या संपात ९० टक्के रिक्षा-टॅक्सी सहभागी होणार असल्याचा दावा महासंघाने केल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला असता.
उबर, ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांनाही सरकारी नियमाची बंधने घालायला हवीत, त्यांचे दरपत्रक निश्चित करायला हवे, अशा मागण्यांसाठी विविध रिक्षा-टॅक्सी संघटना गेली दोन वर्षे आंदोलन करत आहेत. गेल्या महिन्यात २१ जून रोजी जय भगवानदादा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा फटका मुंबईकरांना बसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto and taxi drivers strike cancelled in mumbai
First published on: 25-07-2016 at 17:59 IST