‘लोकसत्ता’च्या अनेक वाचकांकडे नेपाळ-सहलीचे फोटो असतील. त्याहीपेक्षा अधिक दृश्य-आठवणी डोळ्यांपुढे आजही येत असतील. एरवीही नेपाळ हा परदेशी नागरिकांची वर्दळ असलेला देश. पर्यटकच नव्हे तर गिर्यारोहक, व्यापारी, देशांचे किंवा जागतिक संघटनांचे अधिकारी असे अनेक जण नेपाळमध्ये येत असतात, नेपाळ नजरेनं किंवा कॅमेऱ्यानं टिपत असतात.  पण नेपाळी माणसांना नेपाळ कसं दिसतं? एकेकाळी साधेभोळेपणानं राजेशाही कायम ठेवणाऱ्या या देशात गेल्या दशकभरात केवढे तरी बदल घडताहेत.. स्वदेशातल्या बदलांकडे नेपाळी कलावंत कसे पाहतात?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची संधी जहांगीर आर्ट गॅलरीलगतच असलेल्या ‘मॅक्समुल्लर भवना’च्या तळमजल्यावरील दालनात सध्या मिळते आहे. येत्या १८ जूनपर्यंत हे प्रदर्शन दर सोमवार ते शनिवार सुरू राहील, ते नीट पाहायचं तर किमान २५ मिनिटं हवीत! कारण इथं नेपाळमधली १९७०-७५ सालातली कृष्णधवल छायाचित्रं कशी होती इथपासून ते प्रत्येकाहाती (मोबाइल) कॅमेरा आल्यानंतर ‘इन्स्टाग्राम’सारख्या फोटो-केंद्री सुविधेद्वारे शंभराहून अधिक जणांनी टिपलेली नेपाळ-भूकंपानंतरची छायाचित्रं कशी आहेत इथपर्यंतचा- आणि पुढलाही- प्रवास उलगडतो आहे. नेपाळ हे (त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्यघटना स्वीकारण्याच्या आधी) हिंदुराष्ट्र होतं हे खरंच, पण तिथेही अनेक प्रकारचे अल्पसंख्य आहेत. याच विषयावर सुरेन्द्र लावोटी यांनी केलेलं काम विशेष उल्लेखनीय आहे. या अल्पसंख्याकांची काळजी नेपाळ कशी घेणार? त्यांचं सपाटीकरण तर नाही ना होणार? हेच प्रश्न तिथंही आहेत. पण उत्तरं शोधली जाताहेत. कुणी मोर्चे काढून आपल्या अस्तित्वाची जाणीव सरकारला देतात, कुणी संस्कृतीचा प्रत्येक पैलू आवर्जून जपतात.. हे झालं प्रादेशिक, भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल. ‘समलिंगी’- म्हणून लैंगिक प्राधान्यदृष्टय़ा अल्पसंख्यच- असलेल्या व्यक्तीदेखील दबकत का होईना, पण आपलं वेगळेपण आता मान्य करू लागल्या आहेत. फक्त तेवढय़ातूनच नव्हे, तर एकंदर नेपाळमधल्या सर्वच अल्पसंख्याकांच्या धडपडीतून- मुक्ततेकडे प्रवास सुरू असणाऱ्या देशाचे प्रश्न केवढे असतात, हे दिसू लागतं. नेपाळचा असा विचार आपण केलेलाच नसतो.. आपल्या दृष्टीनं तिथले सगळेच ‘नेपाळी’- पण माणसामाणसांत वेगळेपण असतंच, ते इथं दिसतं! नेपाळमध्ये लोकशाही-स्थापना होण्यापूर्वीचे वादळी, संघर्षमय दिवससुद्धा इथं छायाचित्र-स्वरूपात (अनेक छायाचित्रकारांनी टिपलेल्या फोटोंच्या संग्रहातून) जिवंत होतात. किंवा तुओमो मानिनेन यांनी फक्त ‘नेपाळी तरुण’ हाच विषय घेऊन केलेल्या कामामधून अगदी भारताशी मिळतंजुळतं असं आर्थिक फाटलेपण दिसतं. हे तरुण/ तरुणी ‘जिम’, ‘स्पा’, ‘सौंदर्यस्पर्धा’ अशा संस्कृतीकडे आकर्षिले जात आहेत. कोका कोला वा तत्सम बहुराष्ट्रीय कंपन्यांत कंत्राटी म्हणून का होईना, काही जणांना नोकऱ्या मिळत आहेत.. पण दुसऱ्या बाजूला (विशेषत: ग्रामीण भागात) बेकारीही आहे. सायकलरिक्षा ओढण्याचा वडिलार्जित व्यवसायच एकविसाव्या शतकातही ज्यांना करावा लागतो, असेही तरुण आहेत. नेपाळ-भूकंप आणि नंतरची स्थिती दाखवणारे फोटो अस्वस्थ करणारे असले, तरी तांत्रिकदृष्टय़ा यापैकी काही फोटो दाद द्यावी असे आहेत, म्हणून आनंदही होतो पाहताना. कला एकाच वेळी जगापासून दूरही नेते आणि जगाशी जोडतेसुद्धा असं म्हणतात, तस्सा हा अनुभव इथं येऊ शकतो.

नेपाळमधले किंवा नेपाळमध्ये (आपापल्या मायदेशातून येऊन) बरीच वर्षे राहिलेले १३ महत्त्वाचे फोटोग्राफर, त्यांच्याशी जोडले गेलेले अन्य लोक किंवा छायाचित्रकारांचे समूह,  नेपाळचा तसंच छायाचित्रण-कलेच्या वाटचालीचा अभ्यास करणारे आठ समीक्षक/ लेखक यांना एकत्र आणून, गेल्या काही वर्षांत त्यांच्यासह अनेकदा चर्चा-संवाद करून मग हे प्रदर्शन सिद्ध झालेलं आहे. विविध देशांबद्दल असा सखोल आढावा घेणारं एक त्रमासिक दिल्लीतून चालतं. मूळचे मुंबईकर, पण आता आजोबा इब्राहीम अल्काझी यांच्या फोटो-संग्रहाचे प्रमुख म्हणून दिल्लीत राहणारे रेहाब अल्लाना हे फोटोग्राफीमध्ये तरुण काय करताहेत, याचं भान जगाला देण्यासाठी पदरमोड करून, अगदी ध्यासानं ‘पिक्स’ नावाचं हे त्रमासिक चालवतात. त्याच ‘पिक्स’चं हे नेपाळ-प्रदर्शन!

आपल्यासाठी फारच आनंदाची बाब म्हणजे, या त्रमासिकाचा जाडजूड मोठय़ा पुस्तकाच्या आकाराचा (कापडी बांधणीतला) संपूर्ण रंगीत अंक अवघ्या १०० रुपयांना इथं मिळतो आहे. अख्ख्या प्रदर्शनाचा अनुभव पुन्हा पुन्हा घेण्यासाठी, शिवाय या छायाचित्रांच्या निमित्तानं कायकाय विचारमंथन झालं ते वाचण्यासाठी एवढी किंमत फार वाटू नये.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

‘जहांगीर’मधला भारत

‘जहांगीर’मध्ये एका ओळीत असलेल्या तीन दालनांपैकी पहिल्यात केरळचे विल्सन डिसूझा, दुसऱ्यात उदयपूरचे ललित शर्मा, शीतल चौधरी, संदीप पालीवाल आदी पाच जणांचं समूहप्रदर्शन, तर तिसऱ्या दालनात गुलबग्र्याचे अविनाश तुमकर यांची चित्रं आहेत. समोरच ‘सभागृह दालना’मध्ये झारखंड, बिहार, बंगाल आदी राज्यांतून आलेल्या आठ तरुण चित्रकारांचं समूहप्रदर्शन सुरू आहे आणि तशी छोटेखानीच असलेल्या ‘हिरजी जहांगीर गॅलरी’त (वरच्या मजल्यावर) मध्य प्रदेशातल्या भोपाळच्या भारत भवनाची परंपरा सांगणाऱ्या कीर्ती सक्सेना, अंजली अगरवाल, शाम्पा भट्टाचारजी आणि शुभ्रा चांद या चौघींचं समूहप्रदर्शन आहे. म्हणजे थोडक्यात, देशाच्या विविध भागांतल्या चित्रकार-शिल्पकारांची कामं एकाच वेळी पाहायला मिळणार आहेत. अर्थात, छोटय़ा समूहप्रदर्शनांमधल्या चार चित्रकारांच्या कलाकृतींमध्ये काही ताळमेळ नसल्याचा अनुभव अनेकदा येतोच, तो इथंही येण्याची शक्यता आहे. ‘जहांगीर’पासून अवघ्या दीडदोनशे पावलांवर असलेल्या ‘आर्टिस्ट्स सेंटर’मध्ये नीता शिरगावकर, योशिता गुरनानी, शुचि महाजन, दीपाली संपत, पारुल चौधरी, नीता सिप्पी, गुरमीत कौर, सलोनी जैन अशा चित्रकर्तीची चित्रं आहेत, त्या प्रदर्शनात मात्र ‘संगीत :  सूर, नाद, ताल आणि त्याला मिळणारा मानवी प्रतिसाद’ हा मध्यवर्ती विषय आहे. यांपैकी अनेक चित्रकर्ती अननुभवी असल्या, तरी मध्यवर्ती कल्पना ठेवून समूहप्रदर्शन करण्याचा उपक्रम कौतुकास्पदच आहे. ‘आर्टिस्ट्स सेंटर’मधलं हे प्रदर्शन २८ मेपर्यंत, तर ‘जहांगीर’मधली प्रदर्शनं २९ मेपर्यंत खुली राहतील. या दोन्ही गॅलऱ्या रविवारीही सुरू असतात.

आणि हो..

गेल्या आठवडय़ात बाग-बगिचे, उद्यानशास्त्र यांवरल्या एका प्रदर्शनाबद्दल लिहिलं होतं ना? ते येत्या शनिवारी संपणार आहे. फोर्ट (मुंबई) भागात खादी भांडारामागच्या रस्त्यावरल्या ‘क्वीन्स मॅन्शन’मध्ये ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड गॅलरी’ नावाच्या कलादालनात हे मोठ्ठं प्रदर्शन सुरू आहे. निसर्ग, फुलं, बागा यांची आवड असल्यास, लोक त्यांचा किती अभ्यास करतात हे पाहण्यासाठी अवश्य इथं जावं.