मुंबई : भारत-पाकिस्तानमधील १९७१ च्या युद्धाच्या वेळी आम्ही गुजरात बंदरावर होतो. नेमके काय करायचे ते आम्हाला माहीत नव्हते. युद्धनौकेवर असताना वरिष्ठांनी आमच्या हाती आदेश ठेवला. कराचीवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्ही पाकिस्तानच्या ‘मुहाफिज’ युद्धनौकेवर हल्ला चढविला आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, असे त्यावेळी आयएनएस वीर युद्धनौकेवर उपस्थित असलेले निवृत्त लेफ्टनंट कमांडर आय. जे. शर्मा यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले. या युद्धाला ५० वर्षे झाली. पाकिस्तानच्या सागरी तळावर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकाच्या ताफ्याला ‘किलर्स स्क्वॉड्रोन’ असे नाव देण्यात आले होते. या ताफ्याच्या मानांकन प्रदान सोहळ्याला १९७१ च्या युद्धात सहभागी नौदलाचे जवानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी युद्धातील आठवणींना उजाळाही दिला. ‘वीर’, ‘निपात’, ‘निर्घात’ या तीन युद्धनौका पाकिस्तानच्या दिशेने कूच करीत होत्या. युद्धनौका कराची बंदराजवळ पोहोचताच आदेश मिळाला आणि पाकिस्तानच्या युद्धनौकेवर आम्ही एकामागून एक हल्ले केले. एकामागून एक क्षेपणास्त्र डागल्यानंतर पाकिस्तानी युद्धनौकेला जलसमाधी मिळाली, असे युद्धाच्या आठवणींना उजाळा देताना ८० वर्षापेक्षाही जास्त वय असलेले आय. जे. शर्मा यांनी सांगितले. युद्ध सुरू असताना आमचा एक सहकारी खूपच शांत व तणावात असल्याचे निदर्शनास आले. युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. शत्रूच्या जहाज क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यावरील जवानांच्या कुटुंबीयांचे काय होईल, असा विचार मनात डोकावल्याने मन विषण्ण झाल्याचे त्याने सांगितले. शत्रूराष्ट्राने आपले जहाज उद्ध्वस्त केले असते तर आपल्या कुटुंबीयांचे काय होईल याचा विचार केला का, असा सवाल आमच्या सहकाऱ्याला सर्वांनीच विचारला. मात्र त्याच्याकडे त्याचे उत्तर नव्हते, असे शर्मा म्हणाले. पाकिस्तानच्या दिशेने कूच करताना पुढे काय करायचे याबाबत आम्हाला कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. अचानक पाकिस्तानवर हल्ला करण्याचे आदेश आले आणि त्यानंतर नियोजन करुन पाकिस्तानच्या सागरी तळावर हल्ला चढविला. तो यशस्वी झाला. पण युद्धाच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो, असे त्यावेळी वीर युद्धनौकेवर उपस्थित असलेले लेफ्टनंट पी.के. पुरी यांनी सांगितले. या शौर्याचा गौरव झाल्याबद्दल आनंद वाटत आहे, असे उपस्थित युद्धवीरांनी नमूद केले.