दिवा भागात विजेचा धक्का लागून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच याच परिसरात असलेल्या एका चाळीजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरलेल्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का लागून गुरुवारी सकाळी पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला.
दोन निष्पापांचे बळी गेल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाण्यात विजेचा प्रवाह कसा उतरला याचा शोध सुरू केला असता वीजचोरांच्या प्रतापामुळे हे बळी गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
वीजचोरी करत असताना एकाच सर्किटवर विजेचा जास्तीचा भार आल्याने कंडक्टर तुटला आणि वीजवाहिनी पाण्यात खाली पडली, असा बचाव महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, दोन बळी गेल्यानंतरही दिव्यात वारंवार पाणी साचते कसे याचा खुलासा करण्यासाठी महापालिकेतील एकही अधिकारी पुढे आला नाही. तर पाणी साचलेला विभाग कुणाच्या अधिकारात येतो हे सांगण्यास महापालिकेतील एकही वरिष्ठ अभियंता तयार नव्हता.