मान्सून माघारीचे संकेत

मुंबईपासून ५२० किलोमीटर नैर्ऋत्येकडे अरबी समुद्रात असलेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राला पूरक स्थिती उपलब्ध न झाल्याने वादळ निर्माण होण्याआधीच शमले आहे. मात्र, या क्षेत्राचा प्रभाव रविवारी कोकण किनारपट्टीला जाणवत होता. समुद्रात वेगवान वारे वाहत असतानाच मुंबईसह संपूर्ण कोकणात ढगाळ वातावरण होते. पावसाच्या सरी मात्र तुरळक आल्या. सोमवारपासून हा प्रभाव कमी होणार असून, मान्सून माघारीचे संकेत मिळतील.
अरबी समुद्रात पूर्व मध्य भागात गोव्यापासून साधारण ४९० किलोमीटरवर असलेल्या अतितीव्र क्षेत्राचे रूपांतर वादळात होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. मात्र, वायव्येकडून येत असलेल्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे तसेच वेग मंदावल्यामुळे या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाले नाही. वादळ निर्माण झाले नसले तरी या क्षेत्राच्या प्रभावामुळे रविवारीही कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत होते. गोव्यापर्यंत किनारपट्टीवर ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाच्या तुरळक सरी आल्या. मुंबईतही दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण आणि समुद्रावरून येत असलेले तुलनेने गार वारे यामुळे मुंबई व परिसराचे तापमान मात्र आल्हाददायक राहिले. दरम्यान, वादळाचा प्रभाव सोमवारी कमी होत असल्याने त्यानंतर मान्सून परतीचे संकेत दिसू लागतील. संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या काही सरी येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्याला रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने झोडपले. शहराच्या अनेक भागांत प्रचंड पाऊस झाला. पुण्यात ०.१ मिमी तर लोहगाव विमानतळ येथे ०.३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

वादळाचा प्रवास..
’वायव्येकडून येत असलेल्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे अतितीव्र क्षेत्राचे वादळात रूपांतर झाले नाही.
’वादळाचा प्रभाव सोमवारी कमी होत असल्याने त्यानंतर मान्सून माघारीचे संकेत दिसू लागतील.
’मंगळवारी दुपापर्यंत या वादळातील उरलीसुरली हवा निघून जाईल.