राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात होत असलेल्या केंद्र तपास यंत्रणांच्या कारवायांवरुनही मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याबाबतही सातत्याने मागणी केली जात आहे पण त्याआधी काय झाले ते पहा असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे. “धारावीच्या पुर्नविकास प्रकल्पासाठी आम्ही रेल्वेच्या जागेसाठी पाठपुरावा करत आहोत पण प्रश्न अजून सुटलेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतही पाठपुरावा करण्यात आला त्यातही काही झालेले नाही. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी केंद्र अजूनही काही करत नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले. “कोविड काळात महापालिकेने अप्रतिम काम केले आहे. कोविडसोबत लढताना पंतप्रधानांनी पक्षभेद विसरुन सर्व राज्यांना सारखी मदत केली. एखादा बुडत असेल त्याला वाचवण्यासाठी टायर फेकणार की त्याचे टेंडर काढत बसणार? त्याचा जीव वाचवणे ही प्राथमिकता आहे आणि त्यावेळी महापालिकेने तेच केले. महापालिकेने एकही काम विनानिविदा केलेले नाही. तरीसुद्धा त्यांच्यामागे चौकश्या लावण्यात आल्या आहेत. महापालिकेची यंत्रणा तळागाळापासून धारावीत उतरली होती. त्याचे कौतुक कोणाला नाही? यामध्ये कुठे भ्रष्टाचार झाला?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. “लोकांना मी कसा आहे ते माहिती आहे. पण बदनामी करताना कोणत्या थराला जाऊन करता? केंद्रीय तपास यंत्रणा इतक्या पोकळ झाल्या आहेत का? नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग तो पाच वेळी निवडूण येतोय, मंत्री होतोय तरीही केंद्राच्या यंत्रणांना समजलं नाही. त्यांना आता समजतंय की तो दाऊदचा माणूस आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतायंत काय? नुसता थाळ्या वाजवायचं, दिवे पेटवायचं काम करायचं का? दिवे लावतात, तर दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना कोणती माणसं दाऊदची आहेत. तिरंदाज लक्ष्यभेद करतो. आता काय होतंय केंद्रीय यंत्रणा तो बाण आहेत. त्यांना हातात पकडून लक्ष्यावर खुपसलं जातंय. हे तुझं लक्ष्य आणि सगळंच, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. “देवेंद्र फडणवीस तुम्हाला केंद्राने रॉ, सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. त्यामुळे काम आणखी वेगाने होईल. माहिती देणारे, आरोप करणारे, चौकशी करणारे सर्व तुम्हीच आहात. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सगळ्या यंत्रणा अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच कळत नाहीये. एखादा विषय निवडणुकीसाठी किती काळ घेणार तुम्ही. जसा इतकी वर्षे राम मंदिराचा विषय घेतलात यापुढे दाऊदचा घेणार आहात का? रामाच्या नावाने मते मागितल्या नंतर आता दाऊदच्या नावाने मते मागणार आहात का? ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली होती का? ओबामांनी घरात घुसून लादेनला मारले. पण काही न करता तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. "आज तुम्ही नवाब मलिाकांचा राजीनामा मागताय. पण अफजल गुरूला फाशी देण्याची वेळ आली त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी फाशी देऊ नका असं त्या म्हणाल्या होत्या. मग त्या मुफ्तींसोबत सत्तेत भाजपा बसले. बुऱ्हान वाणीला मारल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेचा सारीपाठ मांडला होता,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.