भारतीय शास्त्रीय नृत्याला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारे दिग्गज नृत्य दिग्दर्शक, नृत्य गुरू, भारतीय नृत्याचे अभ्यासक आचार्य पार्वतीकुमार यांचे गुरुवारी दुपारी ग्रॅण्ड रोड येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सुमती, तीन कन्या अपर्णा, अनसूया आणि अंजना असा परिवार आणि त्याचबरोबर शिष्यगण, चाहते, नृत्यप्रेमी रसिक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या शिष्या, शिष्यगण, चाहते उपस्थित होते.
आपले अखंड आयुष्य नृत्यविषयक ध्यास घेणाऱ्या नृत्य तपस्वी आपल्यातून निघून गेला अशा भावना त्यांच्या शिष्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार आचार्य पार्वतीकुमार यांना मिळाले आहेत. त्याचबरोबर १९७८-७९ सालादरम्यान केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याबरोबरच १९८० ते १९८२ या कालावधीत संगीत नाटक अकादमीच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
संध्या पुरेचा, भावना शहा, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह ‘आविष्कार’ चळवळीतील अनेक कलावंतांना आचार्य पार्वतीकुमार यांनी भरतनाटय़म नृत्याचे प्रशिक्षण दिले. संध्या पुरेचा आपल्या गुरूंना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाल्या की, माझे नृत्यगुरू, ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले. भरतनाटय़म हा शास्त्रीय नृत्यप्रकार दक्षिणेकडून महाराष्ट्रात आणण्यात आणि रुजविण्यात आचार्य पार्वतीकुमार यांचा सर्वाधिक मोलाचा वाटा आहे. भरतनाटय़म महाराष्ट्राच्या मातीमधील रसिकश्रोते आणि मुख्यत्वे शिष्यगण यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. गुरू-शिष्य परंपरेप्रमाणेच त्यांच्या घरी राहूनच भरतनाटय़म नृत्याचे प्रशिक्षण घेतले. तब्बल चार दशकांचा सहवास, त्यांचे मार्गदर्शन मिळाले. बुधवारी रात्रीसुद्धा नृत्याविषयीच्या गप्पा करताना त्यांनी भरतनाटय़ममधील बारकावे समजावून सांगितले होते. त्यांच्या निधनामुळे ऋषीतुल्य गुरू आणि गुरू असूनही वडिलांचे प्रेम देणारा पिता गमावला आहे.
रविवारी प्रार्थना सभा
रविवारी, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आचार्य पार्वतीकुमार यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणच्या सभागृहात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्याशी संबंधित अनेक लोक देशभरातून येणार आहेत.