राज्यात ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवाईबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला. त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तुमच्या घरगड्यांना ईडी बोलत आहेत म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटत आहे का? असा सवालही फडणवीसांनी केला. “युक्रेनचे अध्यक्ष हे झेलेन्स्की हे नेटोची मदत मागत आहेत. जर झेलेन्स्की यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं. कारण मुख्यमंत्र्यांकडे असा एक बॉम्ब आहे जो सर्वांवर भारी आहे तो म्हणजे टोमणे बॉम्ब. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात टोमण्यांव्यतिरिक्त काय आहे? हे अरण्यरुदन होतं. मुख्यमंत्र्यांची राज पर पेहराव है, जखम बहोत गेहरा है लगता है बडी चोट खायी है, दर्द बनके बाते जबान पै आई है अशा प्रकारची अवस्था होती. मराठी शाळा बंद झाल्याचे आपण सांगितले नाही. ३८६ कोटी रुपये बंद शाळांवर खर्च केले याबद्द आपण बोलला नाहीत. मुख्यमंत्री नवाब मलिकांचे समर्थन करत आहेत याचे मला मनातून दुःख आहे. नवाब मलिकांनी दाऊदच्या माणसाकडून जमीन खरेदी करणे याचं समर्थन कसे केले जाऊ शकते? इतके वर्षे त्यांच्यासोबत राहिल्यानंतर अशा गोष्टींचे ते समर्थन करतात याचे मला अतिशय दुःख आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. “आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभे राहू शकतो. तुमच्या घरगड्यांना ईडी बोलत आहेत म्हणून तुम्हाला असं वाटत आहे का? उद्या कोण आणि परवा कोण हे कोणीच घोषित करु नये. पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? त्यांनीही बाप बेटा जेलमध्ये जाणार असे घोषित केले ना. महाराष्ट्रावर टीका करत आहोत हा संभ्रम तुम्ही मनातून काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे मराठी आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. पंतप्रधान मोदींसोबत आपण मते मागितली आणि मग सत्तेसाठी कोणत्या शकुनीच्या नादी लागलात. शिखंडीला पुढे करणारी ही औलाद नाही. कपटाने राज्य कौरवांनी घेतले होते. त्यावेळी अर्जुन घाबरला नाही आणि आता आम्हीही घाबरणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. जे मुद्दे आम्ही मांडले होते त्यातल्या एकाही मुद्द्याला उत्तर दिलेले नाही. भाषण विधानसभेतले होते पण शिवाजी पार्कचे झाले, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला. “मला असं वाटतं की, बरं झालं की, आतापर्यंत मुख्यमंत्री चूप होते तर आम्हालाही असं वाटत होतं की, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती धग शिल्लक आहे की, जी मुंबईच्या अपराध्यांच्या विरोधात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती पण आज हे स्पष्ट झालं की, मुंबईतील बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत म्हणजे या सत्तेत ते पुरते मुरले आहे,” अशीही टीका फडणवीसांनी यावेळी केली.