नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर या सगळ्या नाट्याचा दुसरा अंक मुंबईत सुरू झाला आहे. राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तसेच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

“हनुमान चालीसावर एवढा राडा कशासाठी?”

“मला एक गोष्ट समजत नाही की कुणीतरी हनुमान चालीसा म्हणतंय तर त्याच्यावर एवढा राडा कशासाठी? मुळातच भाजपाचा कुणाच्याही घरी आंदोलन करण्याला विरोध आहे. पण कुणीतरी हनुमान चालीसा म्हणतंय म्हटल्यावर इतकी माणसं जमा करायची.. तिथे कुणी हल्ला करायला जाणार नव्हतं”, असं फडणवीस म्हणाले.

“राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते बनवायचंय का?”

दरम्यान, शिवसेनेला राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते बनवायचंय का? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला. “मला समजत नाही की रवी राणा आणि नवनीत राणा यांना राष्ट्रीय नेते बनवण्याचा विडा उचलला आहे का शिवसेनेनं? ते गेले असते, एखाद्या कोपऱ्यात उभे राहिले असते, हनुमान चालीसा म्हटली असती परत गेले असते. कुणी दखलही घेतली नसती. पण इतकी माणसं तिथे जमा करायची. हल्ले करायचे. ही कोणती बुद्धी आहे हे माझ्या लक्षात येत नाही”, असं फडणवीस म्हणाले.

“अमेरिकेचा राष्ट्रपती संजय राऊतांना हुंगतो तरी का? त्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक निशाणा!

“कदाचित शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की असं केल्यानं त्यांना फार मोठी सहानुभूती मिळणार आहे. पण एकूणच शिवसेना नेते, पोलीस आणि गृहविभागानं याची केलेली हाताळणी चुकीची आहे”, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

“राष्ट्रवादीनं गृहमंत्रालयाचे बारा वाजवलेत”

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राष्ट्रपती राजवटीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर देखील फडणवीसांनी निशाणा साधला. “गहमंत्र्यांनाही माहिती आहे की राष्ट्रपती राजवट कधी लागते. हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात ते जनतेला समजत नाही का? उलट त्यांना या गोष्टीचा कमीपणा वाटला पाहिजे की ते गृहमंत्री असताना अशी परिस्थिती चालली आहे. गृहमंत्रालयाचे बारा वाजले आहेत. आज तुम्ही ऑर्डर काढता, उद्या तुम्ही ती थांबवता. पूर्वीच्या गृहमंत्र्यांच्या काळात तर एवढा मोठा घोटाळा होता की ते आता जेलमध्ये आहेत. गृहमंत्रालयाचे राष्ट्रवादीनं अक्षरश: बारा वाजवले आहेत”, असं फडणवीस म्हणाले.