आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देण्यात आलेली मोबाईल सिमकार्ड परत करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून ५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर देशभरात निवडणूका संपेपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आपल्या नगरसेवकांकडून वापरासाठी दिलेली मोबाईल सिमकार्ड परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पालिकेच्या प्रत्येक समितीप्रमुखाला आणि गटनेत्यांना देण्यात आलेली चारचाकी वाहनेसुद्धा परत घेण्यात येणार आहेत. पालिकेच्या आदेशानुसार नगरसेवकांनी सिमकार्ड परत न केल्यास आचारसंहितेच्या काळातील मोबाईलचे बिल या नगरसेवकांना आपल्या पैशांनी भरावे लागणार असल्याचे पत्रक पालिकेच्या नागरी विभागाकडून जारी करण्यात आले आहे. मात्र, मुंबईच्या महापौरांना पालिकेकडून गाडीची सुविधा पुरविली जाणारी सुविधा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.