लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : देशामध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध कंपन्या व कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र मागदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार कामाच्या ठिकाणी थंड पाणी ठेवण्याचे व कामगारांना किमान दर २० मिनिटांनी एक पेला पाणी पिण्याची आठवण करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात दिवसेंदिवस तापमान वाढत असून पुढील काही दिवस तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. मात्र कंपन्या व कारखान्यांमध्ये काम करणारे नागरिक हे सतत काम करत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करून त्याचे पालन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार कामाच्या ठिकाणी पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असून, दर २० मिनिटांनी किंवा त्याहून अधिक वेळा एक पेला पाणी पिण्याची आठवण कर्मचाऱ्यांना करून द्यावी, अशा सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

तसेच कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी तात्पुरता निवारा उभारण्यात यावा, सकाळी व सायंकाळच्या दरम्यान बाहेरच्या कामांचे नियोजन करण्यात यावे. तसेच जर कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविणे आवश्यक असेल तर त्यांना एक तासाच्या कामानंतर पाच मिनिटांची विश्राती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामाचा वेग कमी करावा किंवा अतिरिक्त कामगारांची नियुक्ती करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

कामाच्या तासांचे नियोजन करा

अधिक तापमानात काम करण्यासाठी प्रत्येकजण योग्यरितीने अनुकूल आहे याची खात्री करा. गरम हवामानात अनुकूल होण्यासाठी काही आठवडे लागतात. कामाच्या सुरूवातीच्या पाच दिवसांमध्ये एका दिवसात तीन तासांपेक्षा जास्त काम करू नका. हळूहळू कामाचे प्रमाण आणि वेळ वाढवा. कामगारांना उष्णतेशी संबंधित आजार होण्याचा धोका, चिन्हे आणि लक्षणे वाढवणारे घटक ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या.