अवजड वाहनांची गर्दी, अतिक्रमणे आणि खड्डय़ांमुळे कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची संख्या, रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे उभी केलेली वाहने, अवजड वाहनांची गर्दी, पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणे यात आता खड्डय़ांची भर पडल्याने स्वामी विवेकानंद मार्ग अर्थात एस. व्ही. रोड मार्गाने कांदिवली ते गोरेगावपर्यंतचा रस्ता पार करताना वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांच्या अक्षरश: नाकीनऊ येत आहे. स्थानकाला समांतर जाणाऱ्या या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. परंतु, गेले काही दिवस कांदिवलीतील हुतात्मा राजगुरू उड्डाण पूल ते गोरेगावच्या एमटीएनएल जंक्शनपर्यंत दररोज सकाळी व संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते आहे. वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अर्धा ते पाऊण तास वाहनांच्या रांगेत ताटकळत राहावे लागते. त्यात या मार्गावर मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा सकाळी वर्दळीच्या वेळी पाहायला मिळतात. मालाड परिसरात एस. व्ही. रोडवर अनेक ठिकाणी आजही मोठय़ा प्रमाणात पेव्हर ब्लॉक असून अनेक ठिकाणी ते उखडून वर आले आहेत. त्यामुळे रस्ता खाचखळग्यांचा बनला आहे. त्यात अरुंद अशा रस्त्यावरील अतिक्रमण, रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे व अनधिकृतपणे उभी केलेली वाहने यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. सकाळी वर्दळीच्या वेळी अवघ्या पाच-दहा मिनिटांच्या प्रवासाकरिता ३० ते ४० मिनिटे लागतात, असे या मार्गाने नेहमी प्रवास करणारे सुधीर परांजपे यांनी सांगितले. तर वाहनांच्या गर्दीच्या वेळी या मार्गावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी आणि अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास बंदी आणावी, अशी मागणी येथील रहिवासी राजेश शेट्टी यांनी केली. एस. व्ही. रोडवरील वाहतूक हुतात्मा राजगुरू उड्डाण पूल येथून मालाडच्या दिशेने येताच मार्वे रोडला जाणारा सिग्नल लागतो. तर त्यापुढे पाच मिनिटांवर मालाड सबवे येथून मामलेदार वाडीला जोडणाऱ्या मार्गावर दुसरा सिग्नल आहे. या दोन्ही मार्गावर मोठय़ा प्रमाणात रिक्षा, बस, अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात अरुंद रस्त्यामुळे ही समस्या अधिक भेडसावते. तरी आम्ही सकाळ-संध्याकाळ प्रत्येक सिग्नलजवळ उभे राहून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करतो, असे मालाड वाहूतक विभागाकडून सांगण्यात आले. रुग्णवाहिकेची सर्वाधिक कोंडी वाहतूककोंडीमुळे अनेकदा घरातून वेळेपूर्वी निघूनही कार्यालयात पोहोचण्यास विलंब होतो. त्यात सर्वाधिक त्रास होतो तो रूग्णवाहिकांना. चालकाला कसरत करतच या कोंडीतून वाट काढावी लागते, असे या मार्गाने नेहमी प्रवास करणारे समीर पाटील यांनी सांगितले. वाहतूक कोंडीस कारण की.. * रस्त्यावरील खड्डे, उखडेलेले पेव्हर ब्लॉक * बेकायदेशीर व बेशिस्तपणे दुतर्फा उभी असलेली खासगी वाहने * गर्दीच्या वेळेस अवजड वाहनांना परवानगी * पदपथांवर झालेली अतिक्रमणे.