मुंबई : ओसरू लागलेली करोनाची तिसरी लाट आणि त्याअनुषंगाने हटवण्यात आलेला निर्बंध यांमुळे यंदा होळी, धुळवडीचा उत्साह कितीतरी पटीने वाढला आहे. मुंबईतील मूळ वस्ती असलेल्या कोळीवाडय़ांत प्रथेनुसार बुधवारी कोंबड होळी अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशात नटलेल्या कोळी नागरिकांनी आकर्षकपणे सजवलेल्या कोळीवाडय़ांत होलिकामातेची विधीवत पूजा करून अनिष्ट प्रवृत्तींचे दहन करण्याची प्रार्थना केली. मुंबईतील कोळीवाडय़ांमध्ये आजही गावाप्रमाणे पाटील हे तेथील विविध जमातीचे प्रमुख असतात. त्या पाटलांची होळी साजरी करण्यासाठी कुळं (दाम्पत्य) आदल्या दिवशीच होळी साजरी करतात. कोळी समाजाच्या या होळीला कोंबड होळी म्हटले जाते. कुलाबा, वरळी कोळीवाडा, खारदांडा येथे बुधवारी होळी साजरी करण्यात आली. धारावी कोळीवाडय़ांत मात्र सर्वासोबत १७ मार्चलाच होळी साजरी केली जाणार आहे. होळीनिमित्त कोळीवाडय़ांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. परिसरात रांगोळी काढली जाते. पताक्यांनी पूर्ण कोळीवाडा सजवला जातो. होडय़ांनाही सजवून त्यांची पूजा केली जाते. कोळी महिला व पुरुष पारंपरिक वेशात नटूनथटून होळी आणतात. तिची पूजा केली जाते, नवस बोलला जातो, गाऱ्हाणेही घातले जाते. या दिवशी नवदाम्पत्यांना विशेष मान दिला जातो. या सगळय़ा आनंदात नृत्य, गाण्यांमुळे आणखी साज चढतो. मुंबईतील कोळीवाडय़ांत बुधवारी हे वातावरण पाहायला मिळाले. वरळी व खार दांडा परिसरात मोठय़ा थाटात हा सण साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे करोनामुळे सर्वावरच निर्बंध होते, पण आता करोनाचे संकट टळले आहे. त्यामुळे अशा संकटांपासून भविष्यात सर्वाचे रक्षण कर, असे अशी प्रार्थना होलिका देवतेकडे करण्यात आल्याचे कै. माणिक धर्मा पाटील जमात ट्रस्टचे अध्यक्ष व वरळी कोळीवाडय़ाचे पाटील विजय वरळीकर यांनी सांगितले. बाजारांत उत्साह, नागरिकांची लगबग मुंबईत अन्यत्रही होळी आणि धूळवडीचा उत्साह दिसून येत आहे. होळीसाठी वृक्षतोड न करता बाजारातून गवताच्या पेंढय़ा, शेणाच्या गोवऱ्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे. धुळवडीसाठी लहान मुलांकरिता आकर्षक पिचकाऱ्या आणि रंग बाजारात आले आहेत. यंदा निर्बंध नसल्याने होळी आणि धुळवडीच्या दिवशी मोठय़ा उत्साहात सण साजरे होणार आहेत. कोकणात धाव गेली दोन वर्षे करोनामुळे वाहतुकीवरही निर्बंध होते. मात्र यंदा हे निर्बंध नसल्याने मुंबईत राहणाऱ्या मूळच्या कोकणवासीयांनी शिमग्यासाठी गावाकडे कूच केले आहे. गुरुवारी होळी आणि त्यानंतर सलग येणाऱ्या तीन सुट्टय़ा यांमुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाडय़ा उपलब्ध नसल्याने अनेकांना खासगी वाहनांनी किंवा बसने जादा पैसे मोजून प्रवाशांना कोकण गाठावे लागत आहे.