शेवगाव (जि. नगर) येथील विद्यानगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी मुलगी महाविद्यालयात गेल्याने ती बचावली. या सामूहिक हत्याकांडाने शहर हादरले आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी व माजी सनिक आप्पासाहेब गोिवद हारवणे (वय ५८), त्यांची पत्नी सुनंदा आप्पासाहेब हारवणे (वय ४८), मुलगा मकरंद आप्पासाहेब हारवणे (वय १४), मुलगी स्नेहल आप्पासाहेब हारवणे (वय १९) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. शेवगाव-मिरी रस्त्यावर असलेल्या दाट लोकवस्तीच्या विद्यानगर भागातील पाटबंधारे वसाहतीत हे हत्याकांड शनिवारी रात्री घडले. तरीही रात्री घडलेला प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता. आज सकाळी दूधवाल्यामुळे तो उघड झाला. हे हत्याकांड का झाले असावे हे समजू शकलेले नाही. मिरी रस्त्यावरील गजबजलेल्या भागात विद्यानगरमध्ये पाटबंधारे वसाहत आहे. या वसाहतीत भूमिअभिलेख कार्यालयातील आप्पासाहेब हारवणे हे राहतात. रात्री त्यांच्या घराच्या मागील बाजूने अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश केला. बठकीच्या खोलीत आप्पासाहेब, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा मकरंद हे झोपलेले होते. तर बेडरुमध्ये मुलगी स्नेहल झोपलेली होती. गुंगीचे औषध फवारून मारेकऱ्यांनी त्यांची गळे कापून हत्या केली. सकाळी हारवणे कुटुंबीयाकडे दूधवाला अनंत दारकुंडे नेहमीप्रमाणे आला. आवाज देऊनही हारवणे कुटुंबीय न उठल्यामुळे त्याने आजूबाजूला विचारणा केली. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता तिघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर पाहणी केली असता चौघांचीही हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.