लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मोबाइल चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० मोबाइल हस्तगत करण्यात आले. आरोपींविरोधात मुंबईसह इतर परिसरात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विक्रम भोसले आणि बंटी भोसले अशी अटक आरोपींची नावे आहेत. कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी महावीर नगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान ते दोघेही सराईत मोबाइल चोर असल्याचे उघड झाले.

आणखी वाचा- मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

त्यांच्याविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात किमान सात मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३० हून अधिक चोरलेले विविध कंपनीचे मोबाइल हस्तगत केले. त्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. विक्रम अमरावतीचा, तर बंटी वर्धा येथील रहिवाशी असून सध्या ते दोघेही कांदिवलीतील महावीर नगर परिसरात राहत होते.