अंबरनाथमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टाकीतील गॅसमुळे तिन्ही कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला असून, अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या आयटीआयजवळील इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीची सफाई करण्यासाठी तीन कामगार उतरले होते. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कामगार सफाईसाठी उतरले. यात एकाची तब्येत बिघडल्यामुळे तो औषध आणण्यासाठी दवाखान्यात गेला होता. याच काळात तीन कामगार टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली. टाकीत असलेल्या गॅसमुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. हर्षद, बिंदेश आणि दिनेश अशी मृत कामगारांची नावं आहेत.

तिघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा बळी गेल्याचा आरोप आता केला जात आहे. कलरच्या कामासाठी बोलावून तिन्ही कामगारांना रसायनच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवल्याचा आरोप केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे कामगारांना नाका-तोंडाला बांधण्यासाठी विशेष मास्क दिले नव्हते. कामगारांनी कपडाच बांधलेला होता, असं घटनास्थळी असलेल्यांनी सांगितलं.