मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं होतं, अशी धक्कादायक आकडेवारी माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

गेल्या वर्षीच्या परीक्षेत नापास झालेल्या 97 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे पेपर चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं समोर आलं आहे. 35 हजार म्हणजेच 36 टक्के विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नापास करण्याची करामत केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या पुनर्मूल्यांकनाच्या इतिहासातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये 2014 ते 2016मध्ये जवळपास 73 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासल्या गेल्याचं समोर आलं होतं. 2017च्या दुस-या सत्रातही जवळपास 47,717 विद्यार्थ्यांनी 76,086 उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. ज्यात 18,254 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं.