राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी रात्री केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारवर तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका केली जात आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या चौकशा सुरू केल्यापासून हा विरोध अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी शुक्रवारी रात्री केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे याच मुद्द्यावर बोट ठेवल्याचं सांगितलं आहे. तसेच, त्यांच्या घरी आज किंवा उद्या तपास पथकं येण्याची शक्यताही वर्तवली आहे.

“गांधी लडे थे गोरों से, हम…”

नवाब मलिक यांनी हिंदीतून हे ट्वीट केलं असून त्यात तपास पथकं त्यांच्या घरी धाड टाकू शकतात, असे संकेत दिले आहेत. “मित्रांनो, मी ऐकलंय की माझ्या घरी म्हणे आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो. घाबरणं म्हणजे रोज मरणं. आपल्याला घाबरायचं नाही, लढायचं आहे”, असं मलिक या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यासोबतच, “गांधी लडे थे गोरों से, हम लडेंगे चोरों से”, असं देखील नवाब मलिक यांनी शेवटी लिहिलं आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर नवाब मलिक यांनी गेल्या महिन्याभरात सातत्याने आरोप केले आहेत. बॉलिवुडमधील सेलिब्रिटींकडून वसुली करणे, मुस्लिम असूनही एससी असल्याचं दाखवून आरक्षणाचा लाभ घेणे असे आरोप त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या बहीण जास्मिन यांच्यावर केले आहेत. यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यासंदर्भात समीर वानखेडेंबाबत कोणतीही टीका न करण्याचे निर्देश न्यायालयानं त्यांना दिले आहेत.

अवमानप्रकरणी मलिक यांच्याकडून न्यायालयाची बिनशर्त माफी

नवाब मलिक यांचा बिनशर्त माफीनामा

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याची हमी दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना मलिक यांनी न्यायालयाची माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सादर केले व यापुढे वानखेडे कुटुबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याची हमीही पुन्हा दिली.