शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भले लहान पक्ष असला तरी बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे पक्षाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिकतेची कास धरीत समाजातील उपेक्षित आणि सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन निश्चितच वेगळा असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने अभीष्र्टंचतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १२ डिसेंबर हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपल्या आईचा आणि कुटुंबातील तीन-चार जणांचा याच दिवशी वाढदिवस असतो याची आठवण पवार यांनी सांगितली. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीच्या सूत्रानुसारच पक्षाची वाटचाल सुरू राहावी. सर्व घटकांना बरोबर घेऊन राजकारण आणि समाजकारण केल्यास राष्ट्रवादीबद्दल विश्वासाचे वातावरण तयार होईल, असा मंत्र पवार यांनी या वेळी दिला. आपण शाहू, फुले व डॉ. आंबेडकर यांची नावे घेतो कारण त्यांची वेगळी विचारधारा होती. त्यांची दृष्टी समाजाला पाच ते पन्नास वर्षे पुढे नेणारी होती. ही भावना मनात ठेवूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मोतीलाल राठोड नावाच्या बंजारा समाजातील विद्याथ्र्याने ऐकवलेली पाथरवट कवितेचा उल्लेख करीत पवार म्हणाले, वंचितांवरील अन्यायाची ही कविता ऐकल्यावर रात्री झोप येत नाही. आपण गुन्हेगार असल्याची भावना निर्माण होते. असे अनुभव ऐकल्यावर अस्वस्थ होतो तो खरा कार्यकर्ता, असे पवार यांनी सांगितले. कृषीमंत्री झाल्यावर अन्नधान्य आयात करण्याची पहिली फाइल आली तेव्हा अस्वस्थ झालो होतोे. नाइलाजाने त्यावर स्वाक्षरी केली होती. पण पुढील १० वर्षांत शेतीच्या क्षेत्रात एवढी सुधारणा झाली की पद सोडले तेव्हा भारत हा १८ देशांना अन्नधान्य निर्यात करीत होता, अशी आठवणही पवार यांनी सांगितली. अजित पवार यांनी नेत्यांना सुनावले पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना ठरावीक दिवशी आपापल्या गावात जावे, अशी सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय किंवा राज्याच्या पातळीवर राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांच्या गावातील सरपंच हा वेगळ्या विचारांचा असतो. तेव्हा आधी आपल्या गावातील ग्रामपंचायत पक्षाच्या ताब्यात राहील यावर भर द्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेतेमंडळींना दिल्या. २०१९ मध्ये शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चमत्कार झाला तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल, अशा आशावाद अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द होण्यामागे भाजपच असल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षाचे सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक यांचीही भाषणे झाली.