उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपकी एक असलेल्या जकात करात यावर्षी पालिकेला पहिल्यांदाच मोठी घट सहन करावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने हा फटका बसणार याची कल्पना सहा महिन्यांपूर्वीच आली होती. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. २०१४-१५ या आíथक वर्षांत पालिकेला जकातीचे उद्दिष्ट तर गाठता आले नाहीच, शिवाय मागील वर्षांपेक्षा १२२ कोटी रुपयांनी उत्पन्न कमी झाले.
सुमारे ३० हजार कोटी रुपयांची जमा व खर्च होत असलेल्या पालिकच्या उत्पन्नातील सुमारे २५ टक्के वाटा जकातीचा आहे. दरवर्षी जकातीच्या उत्पन्नात दहा टक्के वाढ होत असल्याने पालिकेसाठी हा विश्वासार्ह स्रोत होता. मात्र गेली दोन वष्रे जकातीतून मिळणारे उत्पन्न घटले आहे. एलबीटीचे सूतोवाच केल्यावर मुंबईतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप आणि तेलाच्या घसरणाऱ्या किमती यामुळे गेल्या आíथक वर्षांत पालिकेला पहिल्यांदा फटका बसला. दरवर्षी जकात गोळा करण्याच्या उद्दिष्टापेक्षा अधिक रक्कम गोळा होत असतानाच २०१३-१४ या वर्षांत अपेक्षेपेक्षा १० टक्के कमी जकात आली. ७२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असताना केवळ ६७७२ कोटी रुपये जमा झाले. आधीच्या आíथक वर्षांपेक्षा केवळ एक कोटी रुपये का होईना, जास्त जमा झाल्याने करसंकलन विभागातील अधिकाऱ्यांनी नि:श्वास सोडला. या वेळी मात्र उद्दिष्टाएवढे तर नाहीच, पण मागील वर्षांएवढेही उत्पन्न जकातीमधून मिळालेले नाही. ७८०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात मागच्या वर्षीपेक्षा १२२ कोटी रुपये कमी गोळा झाले आहेत. २०१४-१५ या वर्षांत ६६५० कोटी रुपये जमा झाल्याने पालिकेच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना अडकण्याची शक्यता आहे.
शहरात दररोज सुमारे आठ ते दहा हजार वाहने प्रवेश करत असली तरी पालिकेच्या जकातीमधील सुमारे ४० टक्के वाटा हा आयातीमधून येतो. संपलेल्या आíथक वर्षांत सुमारे ३००० कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात किमती घसरल्याने २२०० कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात केले गेले. त्याचा परिणाम जकातीवर झाला. पहिल्या सहामाहीत पालिकेला ३४५७ कोटी रुपये जकातीतून मिळवता आले. पुढील सहा महिन्यांत परिस्थिती सुधारण्याची शक्यता नसल्याने ही घट अपेक्षित होती.