सामाजिक संस्थांनी रंगवलेल्या रेल्वेस्थानकांच्या भिंतींचे प्रवाशांकडून विद्रुपीकरण
शहरातील अस्वच्छतेबाबत प्रशासकीय यंत्रणांना दोष देतानाच स्वत: मात्र बिनदिक्कत कुठेही कचरा टाकायचा, या मुंबईकरांच्या वर्तणुकीचा फटका मुंबईतील रेल्वेस्थानकांनाही बसू लागला आहे. मुंबईतील बकाल, घाणेरडय़ा आणि कळकटलेल्या रेल्वे स्थानके सुशोभित करण्यासाठी काही सेवाभावी संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वच्छता करून भिंतींवर आकर्षक चित्रे रेखाटली खरी; पण मुंबईकर प्रवाशांनी या भिंती पुन्हा पानाच्या पिचकाऱ्यांनी विद्रूप करून टाकल्या. एवढेच नव्हे तर स्थानकांची शोभा वाढवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रोपटय़ांच्या कुंडय़ांची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानक सुशोभीकरण करणाऱ्या या संस्थांना आता देखरेखीसाठी या ठिकाणी स्वयंसेवक नेमण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला पाठिंबा देत काही संस्थांनी, महाविद्यालयांनी पुढाकार घेत बोरीवली, कांदिवली, वडाळा अशा अनेक रेल्वे स्थानकांची, पुलांची स्वच्छता करून त्यांचे रूप कलाकृतींची पालटवले होते. विविध संदेश देऊन स्वच्छतेचे धडे देण्यात आले होते. थ्रीडी पद्धतीने पायऱ्या रंगवून त्याद्वारे विविध चित्रे साकारण्यात आली. फलाटांवरील भिंती वारली आणि सामाजिक संदेश देणाऱ्या बोलक्या चित्रांनी सजविण्यात आल्या. या उपक्रमाचे खूप कौतुकही झाले. मात्र सुशोभीकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच रेल्वेस्थानके पुन्हा जैसे थे स्वरूपात पाहायला मिळत आहेत. फलाटांवरील चित्रांची पान, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी पुरती वाट लावली आहे.
कांदिवली एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. श्रॉफ महाविद्यालयातील कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालय प्रशासनाने कांदिवली स्थानकाला सुशोभित केले. स्थानकाची एक हजार मीटर लांबीची भिंत रंगविण्यात आली. सोबतच रेल्वे स्थानकांवर आणि फलाटांवर सुशोभीकरणासाठी रोपटय़ांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या सगळ्याची नासधूस करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीली भूषण यांनी याबाबत रेल्वेकडे तक्रार केली आहे. या सुशोभीकरणावर महाविद्यालयाने सुमारे अडीच लाख रुपये खर्च केला होता. ‘आमच्या दहा-पंधरा विद्यार्थ्यांचा गट झाडांच्या देखभालीसाठी काम करतो. मात्र प्रवाशांमध्ये याबाबत जागरूकता नाही,’ अशी खंत डॉ. लीली भूषण यांनी व्यक्त केली.
देखरेखीसाठी स्वयंसेवक
बोरीवली, खार आणि अन्य रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी कार्यरत असणारी ‘मेक अ डीफरन्स’ (मॅड)या संस्थेने यावर तोडगा काढला आहे. एका स्थानकाच्या सुशोभीकरणाचा खर्च हा किमान दोन ते तीन लाख आहे. बोरीवलीसारख्या मोठय़ा स्थानकांसाठी संस्थेला पाच लाख रुपये खर्च आला. संपूर्ण मुंबईच्या फलाटाच्या सुशोभीकरणासाठीचा खर्च काही कोटींचा आहे. हा खर्च उचलण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातून काही संस्था स्वत:हून पुढे येत आहेत. हे सर्व काम यापुढे सुरक्षित राहावे यासाठी रेल्वे प्रशासनाची मदत घेणार असल्याचे ‘मॅड’ संस्थेच्या राहुल बॅम्ब यांनी दिली. प्रवाशांची सवय पाहता सुशोभीकरणाबरोबरच यापुढे आम्ही स्वच्छतेबाबत जागरूकताही निर्माण करणार आहोत, असे राहुल यांनी सांगितले. तसेच, प्रवाशांनी चित्रांची नासधूस केली असली तरी हे काम थांबविणार नसल्याचे सांगत उलट हे काम विस्तारून पश्चिम रेल्वेवरील ३६ आणि मध्य रेल्वेवरील २१ स्थानकांचे सुशोभीकरण करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.