मुंबई : करोना काळात दोन वर्षे बंद असलेल्या नाटय़ व्यवसायाने पुन्हा उभारी घ्यायला सुरुवात केली आहे. सध्या सुट्टीचा काळ असल्याने या दोन महिन्यांत आठवडा अखेरीस नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका नाटकाचा प्रयोग रंगात आला असताना रवींद्र नाटय़गृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने प्रेक्षकांनी कलाकारांना बोल लावले. या प्रसंगानंतर रवींद्र नाटय़गृहाची दुरवस्था आणि ढिसाळ व्यवस्थापनाबद्दलच्या तक्रारींना तोंड फुटले आहे. दुप्पट भाडे आकारूनही मुलभूत सोयीसुविधा दिल्या जात नसल्याबद्दल नाटय़कर्मी जाहीर नाराजी व्यक्त करीत आहेत. दोन वर्षे देखभालीविना बंद असलेल्या नाटय़गृहांना मोठय़ा प्रमाणावर डागडुजी करून नव्याने सुरुवात करावी लागते आहे. दादर परिसरातील शिवाजी नाटय़मंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाटय़संकुल या रंगकर्मी आणि प्रेक्षकांसाठीच्या दोन हक्कांच्या जागा गेले काही दिवस बंद होत्या. यामुळे सध्या प्रभादेवीतील रवींद्र नाटय़गृहातही प्रयोग करण्यावाचून निर्मात्यांकडे पर्याय नाही. ‘खरं खरं सांग’ या आमच्या नाटकाच्या रविवारच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. साडेचारचा आमचा प्रयोग सुरू असतानाच वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. उकडायला लागल्याने नाराज प्रेक्षकांनी तक्रार करायला सुरूवात केली. साडेपाचशे प्रेक्षकांपैकी ८० ते ९० प्रेक्षक नाटक सोडून गेले. त्यांना तिकिटाचे पैसे आम्ही परत दिले. नाटय़गृहाच्या कारभाराचा फटका आम्हाला बसला. आत्ताही वातानुकूलित यंत्रणा सुरू आहे, पण नाटय़गृहात गार वाटेल का, याबद्दल आम्ही खात्री देऊ शकत नाही, अशी भूमिका तेथील व्यवस्थापनाने घेतल्याने १ आणि १५ मेचे आमचे तिथले प्रयोग आम्ही रद्द केले आहेत, अशी माहिती या नाटकाचे व्यवस्थापक नितीन नाईक यांनी दिली. या प्रयोगानंतर एकूणच रवींद्र नाटय़मंदिर येथील मेकअप रुम, तेथील प्रसाधनगृहे यांच्या दुरावस्थेबद्दल अभिनेता आस्ताद काळेसह काही कलाकारांनी समाजमाध्यमांवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. आम्ही कलाकार आहोत, आमचे काम प्रयोग उत्तम सादर करणे आहे. वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानंतर प्रेक्षकांना उत्तर देणे, आर्थिक नुकसान भरून देणे ही नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र प्रयोगाच्या दिवशी नाटय़गृहाचे व्यवस्थापकही जागेवर नव्हते. झाल्या घटनेची जबाबदारीही नाटय़गृहाने घेतली नाही, असे अभिनेता आनंद इंगळे यांनी स्पष्ट केले. नाटय़गृहातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे.. नाटय़गृहातील वातानुकूलित यंत्रणा जुनी आहे. दोन वर्ष नाटय़गृहे बंद असल्याने इथल्या अनेक गोष्टी सतत नादुरूस्त होत असतात. सध्या आमच्याकडे कर्मचारीही कमी असल्याने दुरूस्ती - देखभालीच्या कामांना विलंब लागतो, अशी माहिती नाटय़गृहाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दिली. हे नाटय़गृह सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या अखत्यारित येते. नाटय़गृहाचे सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चौरे यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी आलेले नवे कार्यसंचालक अजून रुजू झालेले नाहीत. याही परिस्थितीत प्रसाधनगृहांच्या कडय़ांसह इतर दुरूस्तींची कामे पूर्ण करण्यात आली आहे. वातानुकूलित यंत्रणाही दुरुस्त असल्याने आम्ही नोंदणी थांबवलेली नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र पुढचा महिनाभर नृत्य - गायन यांवर आधारित ठराविक कार्यक्रम सोडल्यास नाटय़गृहांमध्ये नाटकांच्या प्रयोगासाठी बुकिंग झालेले नाही हे दिसून येते. विदारक स्थिती.. नाटय़गृहातील रंगमंचामागे असलेल्या मेकअप रुममधील प्रसाधनगृहांना कडय़ा नाहीत, तेथील आरसेही खराब झाले आहेत. इस्त्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या टेबलावरील कापडाचे आच्छादन मळले आहे. प्रसाधनगृहांच्या दरवाजाचे लाकूड खालून सडले आहे. काही ठिकाणी भिंतींना पोपडे पडले आहेत. अधिक दर आकारूनही.. मुंबईतील पालिकेच्या नाटय़गृहांमध्ये दर प्रयोगाला तीन ते चार हजार रुपये भाडे घेतले जाते. रवींद्र नाटय़मंदिराचे भाडे जवळपास दुप्पट नऊ - साडेनऊ हजार रुपयांच्या आसपास आहे. दुप्पट भाडे आकारूनही नाटय़गृहात उत्तम व्यवस्था का देता येत नाही?, असा प्रश्न अभिनेता आनंद इंगळे यांनी उपस्थित केला.