प्रीती राठी अॅसिड हल्लाप्रकरणात मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अंकुर पनवार दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने कलम ३०२ आणि कलम ३२६ ब अंतर्गत अंकुरला दोषी ठरवल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. अंकुश पनवारने एकतर्फी प्रेमप्रकरणातून प्रीती राठीवर अॅसिड हल्ला केला होता. यामध्ये उपचारादरम्यान मुंबईत प्रीतीचा मृत्यू झाला होता.

नौदलच्या रुग्णालयात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी हरयाणाची प्रीती राठी दिल्लीहून २ मे २०१३ रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती कुटुंबियासमवेत उतरत असताना अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावर जवळून अ‍ॅसिड फेकले होते. सुरूवातीला तिला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल केले होते. या अ‍ॅसिड हल्ल्यात तिने डावा डोळा गमावला होता. तर उजव्या डोळ्याची दृष्टीही कमकुवत झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर तिला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १७ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते. अ‍ॅसिड पोटात गेल्याने तिची अन्ननलिका जळाली होती. तसेच तिचे एक फुफ्प्फुसही निकामी झाले होते. दररोज रक्तस्त्राव होत असल्याने तिला दररोज पाच ते सहा बाटल्या रक्त चढविण्यात येत होते. प्रकृती सुधारत नसल्याने तिच्यावर मोठी शस्त्रक्रियादेखील शक्य होत नव्हती. त्यातच मूत्रपिंडाचाही त्रास सुरू झाला होता व हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही प्रीतीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले होते.
नशिबानं माझ्यासोबतच असं का केलं? मृत्यूपूर्वी प्रिती राठीची भावना