राज्याच्या वीजवापरात २०१२-१३ मध्ये सव्वाचार टक्क्यांची वाढ तर त्याचवेळी वीजनिर्मितीत दीड टक्क्यांची घट झाल्याचे चित्र बुधवारी आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले. तसेच सरकारी वीजनिर्मिती कमी होत असताना खासगी वीजप्रकल्पांचा राज्यातील ऊर्जानिर्मितीमधील टक्का मात्र ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्याच्या वीजनिर्मिती क्षमतेत सरकारी क्षेत्राचे प्रमाण ४३.२ टक्के, खासगी क्षेत्र ४७.९ टक्के आहे. राज्यात २०११-१२ मध्ये एकूण ८९ हजार ४६५ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. २०१२-१३ मध्ये हे प्रमाण ८८ हजार १३९ दशलक्ष युनिटपर्यंत खाली आले. म्हणजेच दीड टक्क्यांची घट झाली.
९३२० मेगावॉटचे प्रकल्प प्रस्तावित
राज्यात ‘महानिर्मिती’च्या माध्यमातून कोळशावर आधारित आणि गॅसवर आधारित असे एकूण ९३२० मेगावॉटचे वीजप्रकल्प येत्या तीन वर्षांत अपेक्षित आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेत हे प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहितीही देण्यात आली आहे.