महाराष्ट्रातील राज्यकर्ते राज्याला ‘ट्रॉमा’मध्ये टाकत असून आता जनतेचा त्यांच्यावर तसूभरही विश्वास राहिलेला नाही. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच राज्याला या संकटातून बाहेर काढेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला.
महापालिकेने जोगेश्वरी येथे उभारलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालया’चे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. भाजप नेते गोपीनाथ मुंडे, महापौर सुनील प्रभू, उपमहापौर मोहन मिठबावकर, पालिका आयुक्त सीताराम कुंटे या वेळी उपस्थित होते. मुंबईत मलेरियाची साथ पसरली तेव्हा रुग्ण विश्वासाने पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत होते. त्या वेळी सरकारी रुग्णालये मात्र ओस पडली होती. यावरूनच नागरिकांचा सरकारवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.