मुंबई : राज्यात सध्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत, त्याचा विचार करुन कोणत्याही परिस्थितीत वीजेचे बारनियमन करुन त्यांच्या अभ्यासात वत्त्यय येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे, त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे, मात्र प्रसंगी महागडी वीज खरेदी करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, परंतु भारनियमन करुन राज्य अंधारात जाऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात उष्णतेची लाट आली आहे, पुढील काही दिवसांत ती अधिक तीव्र होण्याचा अंदाच आहे. त्यामुळे वीजेची मागणी वाढत आहे. मंगळवारी राज्यात २८ हजार मेगावॉटपर्यंत मागणी गेली होती. अशातच वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परंतु १० वी, १२ वीच्या सुरु असेलल्या परीक्षा, शेतात उभी असलेली रब्बी पिके, याचा विचार करुन संप मागे घ्यावा, असे आपण कर्मचारी संघटनांना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन संप मागे घेण्यात आला, असे राऊत यांनी सांगितले. राज्यात रब्बी पिकाचा हंगाम लक्षात घेऊन कृषीपंप वीज देयके थकबाकी वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांना त्रास होईल, असा आघाडी सरकार कोणताही निर्णय घेणार नाही. परंतु शेतकऱ्यांनीही वीज देयके वेळत भरुन आघाडी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.