प्राध्यापकांच्या संपामुळे पर्यायी व्यवस्था करून मुंबई विद्यापीठाने परीक्षेला सुरुवात केली असली तरी आता अंतर्गत मूल्यमापन (इंटर्नल असेसमेंट) गुण विद्यापीठाला न कळविण्याचे हत्यार प्राध्यापकांनी उपसले आहे. त्यामुळे परीक्षांच्या निकालांना विलंब होण्याची चिन्हे आहेत. परीक्षांतील ४० टक्के गुण हे महाविद्यालयांनी करावयाच्या इंटर्नल असेसमेंटवर अवलंबून आहेत. हे गुण विद्यापीठाला कळविले जाणार नाहीत, असे बुक्टूचे सरचिटणीस मधू परांजपे यांनी सांगितले. त्यामुळे परीक्षा झाल्या, तरी निकालाच्या विलंबाची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर राहणार आहे.
परीक्षेच्या वेळी प्राध्यापकांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. त्यांनी सरकारच्या विरोधात मूक निदर्शने केली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून महाविद्यालयांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.