विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या आणि घराजवळ सोडणाऱ्या शालेय बसगाड्या, व्हॅनचे चालक-मालक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत आहे. या गाड्यांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येत असून अग्निसुरक्षेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांचे उंल्लंघन करणाऱ्या मुंबईतील सुमारे १०० हून अधिक शालेय बस, व्हॅनविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, अशा बसगाड्या आणि व्हॅनविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्वच आरटीओना दिले आहेत.

करोनाकाळात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी, शालेय बसगाड्या आणि व्हॅन सेवाही बंद होती. परिणामी, शालेय बसचालक-मालकांचे उत्पन्न बुडाले होते. आता शाळा सुरू होताच या बसगाड्या, व्हॅनमधून विदयार्थी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र अनेक शालेय बसगाड्या आणि व्हॅन चालक – मालक याबाबतच्या मार्गदर्निशक तत्वांतील नियमांचा भंग करून क्षमतेपेक्षा जादा विदयार्थ्यांची ने-आण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अग्निशमन सुरक्षा यंत्रणाबाबतच्या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर वैध विमा प्रमाणपत्र, वैध वाहन योग्यता प्रमाणपत्र, मदतनीस याबाबतच्या नियम व अटींचे पालन करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांची धोकादायकरित्या वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारी लक्षात घेऊन आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईतील वडाळा, बोरिवली, अंधेरी आणि ताडदेव आरटीओने केलेल्या कारवाईसाठी हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान अनेक स्कूल बस आणि व्हॅन नियमाचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले.

वडाळा आरटीओने २६ जुलैपासून सुरू कारवाई सुरू केली असून आतापर्यंत ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश शालेय बस आणि व्हॅनमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव होता. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस-व्हॅनचे वैध विमा आणि योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी केलेल्या कारवाईदरम्यान काही चालकांनी दंडाची रक्कम जमा केली. काही चालकांकडून दंड वसूल झालेला नाही. आतापर्यंत पाच हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वडाळा आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली.

अंधेरी आरटीओने केलेल्या कारवाईत परवाना नसलेल्या २८ आणि परवाना असलेल्या २४ वाहनांचा समावेश असून यापैकी वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अग्निशमन यंत्रणा नसल्याबद्दल १३, वैध विमा प्रमाणपत्र नसल्याबद्दल १९ आणि आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याबद्दल नऊ वाहनांवर कारवाई करण्यात आली. बोरिवली आरटीओअंतर्गतही २५ शालेय बस आणि व्हॅनवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दोन्ही आरटीओने मिळून १२ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. ताडदेव आरटीओकडूनही कारवाई करण्यात येत आहे.

या नियमांचा अभाव

  • शालेय बसगाड्या, व्हॅन पिवळा रंगाची असावी आणि वाहनाच्या पुढ-मागे शालेय बस असे नमूद करावे
  • शालेय किंवा अन्य कोणतेही कंत्राट असलेल्या वाहनांना पिवळा रंग आवश्यक असणार नाही. परंतु वाहनाच्या सर्व बाजूनी मध्यभागी २० इंचाच्या पिवळ्या पट्टी असावी.
  • आठ वर्षे आयुर्मान पूर्ण झाल्यानंतरही शालेय बस वापर करू नये.
  • बसमध्ये प्रथमोपचार पेटी आणि अग्निशमनविषयक उपकरणे उपलब्ध करावी.
  • वाहनचालकाला पाच वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव असावा.