पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. आता संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढला आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली होती.

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या अगोदर जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. आज चार्जशीटची कॅापी आम्हाला देण्यात आली. तर, संजय राऊत यांना जामीन मिळेल की नाही यावर कोर्टात येत्या बुधवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. असं संजय राऊत यांचे वकील विक्रांत साबने यांनी सांगितलं आहे.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा राऊत यांनी विशेष न्यायालयात केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होणार नाही, असे विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर ईडीच्यावतीने ॲड. कविता पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.