विद्यापीठांची प्रतवारी तेथील परीक्षांच्या विश्वासार्हतेऐवजी बाहेरील देशांमध्ये किती विद्यापीठांशी करार केले आहेत, यावर ठरू लागली आहे. हे चिंताजनकच आहे. परीक्षा घेणे हे विद्यापीठांचे महत्त्वाचे काम आहे. त्यामध्ये हेळसांड म्हणजे गुणवत्तेशीच प्रतारणा केल्यासारखेच. पण ती करून विद्यापीठे नको नको त्या उद्योगांत लक्ष घालू लागली आहेत. त्यानिमित्ताने कुलगुरूंचे परदेश दौरे वाढण्याव्यतिरिक्त काय होते, हाही प्रश्नच आहे. तेव्हा नावात विद्यासागर असलेल्या कुलपती राव यांनी विद्यापीठांच्या कारभारात अधिक लक्ष घालावे आणि आपल्या नावास जागावे. विद्यासागराच्या नाकाखालीच अशी अविद्या वाढणे बरे नाही, असे मत मांडलेला ‘विद्यासागरातील अविद्या’ या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत उदगीर येथील फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिल्पा नागरगोजे ही ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोल घुगुळ याने दुसरे पारितोषिक पटकावले. अग्रलेखावर मत मांडणाऱ्या शिल्पा आणि अमोल यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. शिल्पाला सात हजार आणि प्रमाणपत्र तर अमोलला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षणतज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.