शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत ठिकठिकाणी निष्ठा यात्रा काढली. निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करत असून बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. दरम्यान चांदिवलीमधील सभेत भाषण करत असताना अजान सुरू झाली असता आदित्य ठाकरे यांनी काही वेळासाठी भाषण थांबवलं. आदित्य ठाकरेंच्या सभेमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं? आदित्य ठाकरे बंडखोर आमदार दिलीप लांडे यांच्या मतदारसंघाचा दौरा करत होते. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी दिलीप लांडे यांच्यावर कडाडून टीका केली. आदित्य ठाकरे मंचावरुन भाषण करत असताना अजान सुरू होताच काही वेळासाठी भाषण थांबवण्यात आलं. 'आपण दोन मिनिटं थांबूयात' असं सांगत आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं. सभेतील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षेने स्थापन केलेलं सरकार’ मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली. आमचं काय चुकलं जे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा प्रश्न आदित्य यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला. "माझ्या आणि कोणत्याच शिवसैनिकाच्या मनात पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र, ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला याचं दुःख आहे," असं आदित्य यांनी आपल्या भाषणात म्हटलं. अजान सुरु होताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं महापौरांचं भाषणअजान सुरु होताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं महापौरांचं भाषण राज्यामध्ये हे ४० लोक कुठेही फिरले तरी गद्दार म्हणूनच फिरणार असा टोलाही आदित्य यांनी लगावला. यापैकी कोणाचीही राजीनामा देण्याची हिंमत नाही. हे गद्दार आहेत आणि हे ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यामधील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन टोला लगावताना आदित्य यांनी, “दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात आहे,” असं म्हटलं. तसंच कायदेशीर लढाईबाबतीत भाष्य करताना, कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विधानसभेमध्ये हे ४० गद्दार आरोपींप्रमाणे आले आम्ही १४ जण स्वाभिमानाने सभागृहामध्ये बसलो होतो असंही आदित्य ठाकरे म्हणाले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्येही ते कशापद्धतीने बसमधून आले आणि गेले हे आपण सर्वांनी पाहिलं, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.