राम मंदिर आणि बाबरी मशीद हा जुना वाद आहे. वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढला जावा अशी मागणी होते आहे. अशात आता शिवसेनेनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर आहेत. तसेच अनेक शिवसैनिकही त्या दिशेने रवाना झाले आहेत. अशात जो खासदार राम मंदिराला विरोध करेल त्याचं देशात फिरणं कठीण होईल असा इशाराच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राष्ट्रपती भवनापासून उत्तरप्रदेशातपर्यंत भाजपाचेच सरकार आहे. तरीही अध्यादेश येण्यास एवढा वेळ का लागतो आहे असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

आम्ही त्यावेळी १७ मिनिटात बाबरी मशीद पाडली होती आता या मंदिरासंबंधी अध्यादेश आणण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. राज्यसभेत असे अनेक खासदार आहेत ज्यांना राम मंदिर हवे आहे आणि त्यासाठीचा अध्यादेशही हवा आहे. जो खासदार विरोध दर्शवेल त्याचं देशात फिरणं कठीण होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राम मंदिराचा प्रश्न निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा चर्चेत येतो आहे. भाजपाला राम मंदिर बांधायचे नाही फक्त निवडणुका जवळ आल्याने राम मंदिराचा विषय पुन्हा काढला जातो आहे आणि या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन मतं मिळवण्यासाठी प्रयत्न होतो आहे असा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधकांनी केला आहे. अशात आता शिवसेनेने जो राम मंदिराला विरोध करेल त्याला देशात फिरणं कठीण होईल असं म्हटलं आहे.