मुंबई : वाहनांना सुरक्षेची व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांतून एकदा वाहन योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र वाहनांची तपासणी न होताच व प्रमाणपत्र न घेताच ही वाहने धोकादायकरित्या धावत असून त्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयाने तीन दिवस विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४ एप्रिलपासून या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड, जड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय वाहन धावल्यास त्यावर आरटीओकडून कारवाई केली जाते. वाहनांचे ब्रेक कसे किंवा किती क्षमतेचे असावेत. दिव्यांची प्रखरता किती व कशी हवी, याबाबत काही नियम आहेत. त्यानुसार ब्रेक व दिव्यांच्या तपासणीबरोबरच एका स्वतंत्र ट्रॅकवर संबंधित वाहन नेमके कसे चालते याचीही तपासणी या अंतर्गत होत असते. फिटनेसची चाचणी घेणाऱ्या वाहन निरीक्षकांनी प्रत्यक्षात ते वाहन तपासून व आवश्यकतेनुसार त्याच्या चालविण्याचीही चाचणी घेतली जाते आणि त्यानंतरच वाहन योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. दोन वर्षांतून एकदा तपासणी होते. मुंबईत तर आठ वर्षे उलटून गेलेली व्यावसायिक वाहने चालवण्यास मनाई आहे. परिवहन विभागाकडे तक्रारी वाहन योग्यता प्रमाणपत्र न घेताच अनेक वाहने रस्त्यावर धावत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या. त्यामुळे राज्य शासनाने अशा वाहनांविरोधात कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार ४ ते ६ एप्रिलपर्यंत राज्यात विशेष मोहीम घेऊन कारवाई केली जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्र दाखवले नाही किंवा योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आले तरीही वाहन चालविले जाते. योग्यता प्रमाणपत्र असतानाही रस्त्यावर चालवण्यास सुस्थितीत नसणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.