केंद्र सरकार वा सरकारशी सलग्न संघटनांच्या प्रतिनिधींनी बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, असा प्रचार करू नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात लक्ष घालावे, अशी विनंती अखिल भारतीय बौद्ध महासभेने केली आहे. मुंबईत बौद्ध महासभेचे नुकतेच अधिवेशन पार पडले. महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार अॅड. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अधिवेशनात काही महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यात केंद्र सरकार व सरकारशी संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींनी बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असा प्रचार करू नये, या ठरावाचा समावेश आहे. बुद्धाचा जन्म भारतात झाला, त्याबद्दल बौद्ध राष्ट्रांना आपल्या देशाबद्दल आदर वाटतो. बौद्ध राष्ट्रांचे भारताशी अत्यंत जवळचे, मैत्रीचे संबंध जुळू शकतात. परंतु बुद्धाबद्दलच्या अपप्रचाराचा मुद्दा अडचणीचा ठरू नये, असे ठरावाच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बौद्ध, जैन व शिख हे देवाला मानत नाहीत, त्यामुळे हिंदू धर्मापेक्षा हे धर्म वेगळे आहेत, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार बौद्ध धर्माचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात यावे, अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला आहे.