दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी तिला श्रद्धांजली वाहत समाजाच्या मानसिकतेत बदल आणि कठोर कायद्याची गरज व्यक्त केली.
बलात्कारासारखे मानवतेला कलंक असलेले गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे, हीच दिल्लीतील बलात्कारात बळी पडलेल्या तरुणीला खरी श्रद्धांजली ठरेल़  कठोर कायदा, स्त्रीवरील अत्याचाराच्या खटल्यांची जलद सुनावणी व शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व समाजप्रबोधन अशा गोष्टींतूनच या घटना नियंत्रणात येऊ शकतात, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
तर या घटनेने आपण सर्वानीच पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे. सरकार, पोलीस व प्रशासनाने या प्रश्नावर सतर्कता दाखवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी, खासगी ठिकाणी महिला व युवतींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर या तरुणीचा अंत्यसंस्कार सरकारी इतमामात व्हावा, अशी मागणी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्या तरुणीला श्रद्धांजली वाहत कार्यकर्त्यांना ३१ डिसेंबर व नवीन वर्षांचा सोहळा साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबर रोजी रिपाइं कार्यकर्ते कुलाबा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चा काढतील, असेही आठवले यांनी सांगितले. या भयंकर घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यास शब्द नाहीत. सामाजातून ही विकृती दूर करणे हीच या मुलीला श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व्यक्त केली आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी नवीन वर्षांचा जल्लोष न करता तिला श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन काँग्रेसचे आमदार चरणसिंग सप्रा यांनीही केले आह़े   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike law needed chief minister
First published on: 30-12-2012 at 03:31 IST